मुंबई │ मानखुर्द प्रतिनिधी
वर्षानुवर्षे फसव्या आश्वासनांच्या ओझ्याखाली जगणाऱ्या महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प (वॉर्ड क्र. १४३) मधील नागरिकांनी यावेळी राजकीय पक्षांना आणि सत्तेच्या संपूर्ण यंत्रणेलाच झटका दिला आहे. “आता मंत्री–खासदार नकोत, आम्ही दिलेलाच उमेदवार निवडणार” असा ठाम निर्धार करत मतदारांनी अपक्ष उमेदवार सौ. केशर सदाशिव ऊर्फ दाजी बालगुडे यांच्या पाठीशी उभे राहत लोकशाहीचा खरा अर्थ अधोरेखित केला आहे.
अरुणकुमार वैद्य चाळ, खंडोबा मंदिर, टेनंट असोसिएशन, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सुभाषचंद्र बोस विद्यालय परिसर, ओम शिवशक्ती चाळ, समता चाळ आणि ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात काढलेल्या प्रचार रॅलीतून एकच संदेश दिला गेला—ही निवडणूक नेत्यांची नसून नागरिकांची आहे. महिलांनी घराघरातून उमेदवाराचे औक्षण करत “दाजी आमचेच आहेत” असा गजर केला. हा उत्सव नव्हता, तर फसवणुकीवर दिलेला लोकशाहीचा न्यायनिवाडा होता.
पिण्याच्या पाण्याची टंचाई, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, साचलेली गटारे, मोडलेली व निकामी फायबर टॉयलेट्स—विशेषतः महिलांच्या आयुष्यातील हा रोजचा छळ आहे. “आता कोणत्याही आश्वासनांना भुलणार नाही” असा ठाम इशारा महिला मतदारांनी दिला.
नाल्यावर उभ्या झोपड्यांचे शिवशाही पुनर्वसनाचे गाजर दाखवले गेले. मागील महापालिका निवडणुकीत त्रिमूर्ती बिल्डिंग ते खंडोबानगरपर्यंत सर्वांचे इमारतीत पुनर्वसन होईल असे फ्लेक्स झळकले; ते फ्लेक्स फाटले, पण लोक आजही दलदलीतच अडकले आहेत. ‘सफल बिल्डर’चे निवडणूकपुरते उघडलेले कार्यालय बंद पडले, मेट्रोमध्ये स्थानिकांना नोकरी देण्याची आश्वासनेही हवेत विरली. “जुने नागरिक अपात्र आणि नवे पात्र हा उघड अन्याय आम्ही वर्षानुवर्षे सहन केला. आता बस्स!” अशी संतप्त प्रतिक्रिया तरुण ज्येष्ठांनी दिली.
आशिया खंडातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड महाराष्ट्रनगरमध्ये उभे राहिले, पण कामे बाहेरच्या कंत्राटदारांना देऊन स्थानिक तरुणांना दमबाजीने हाकलल्याची तक्रारही नागरिकांनी मांडली. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १४३ मधील ही लढाई एका उमेदवारापुरती मर्यादित न राहता सत्तेच्या अपयशाविरुद्ध उभ्या राहिलेल्या सामान्य माणसाची लोकशाही चळवळ बनली आहे.
“केशर दाजी बालगुडे यांचा विजय म्हणजेच आमचा विजय” — हा नारा आता मानखुर्दच्या गल्लीगल्लीतून सत्तेच्या दारात घुमत आहे.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369














