मुंबई | मानखुर्द प्रतिनिधी
महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प (वॉर्ड क्र. १४३)मध्ये यंदाची निवडणूक पक्ष, नेते किंवा प्रचारयंत्रणांवर नव्हे, तर कामावर, विश्वासावर आणि परिसराच्या माणसावर लढली जात आहे. घराघरांत पोहोचलेले नाव – नळवाले दाजी उर्फ सदाशिव बालगुडे आणि त्यांच्या पत्नी सौ. केशर सदाशिव बालगुडे – हाच येथील खरा लोकउमेदवार असल्याचे संत सावतामाळी भाजीमार्केटचे अध्यक्ष व्यावसायिक पिंटूशेठ कमाणे यांनी स्पष्ट केले.
“महाराष्ट्रनगरमध्ये दाजी बालगुडे नाव माहिती नाही असा एकही नागरिक नाही,” असे सांगत कमाणे म्हणाले की, आम्हाला पक्षांनी लादलेले उमेदवार नकोत; आमच्यातून उभा राहिलेला, आमच्यासोबत जगणारा माणूस हवा आहे. नळवाले दाजी निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षानुवर्षे प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात पोहोचलेले नाव आहे. गटार तुंबले, चेंबर ओसंडले, पाणी आले नाही – अशा प्रत्येक संकटात ते स्वतः धावून जातात. त्यामुळे दाजींना प्रचाराची गरज नाही; मतदारच त्यांचा प्रचार आहे.
परिसरातील नागरिकांचा रोष मात्र राजकीय व्यवस्थेविरोधात तीव्र आहे. खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक निवडून दिले; मात्र निवडणुका संपताच कोणीही परिसराकडे फिरकले नाही. गटारलाइन साफ नाही, पाणी पुरेसे नाही, आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही भागांत मुद्दाम कमी दाबाने पाणीपुरवठा करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोपही होत आहे.
या पार्श्वभूमीवर किन्नर समुदायाच्या नेहा नानी यांनी दाजींना जाहीर पाठिंबा दिला. “दाजी हे सर्वांचे दाजी आहेत. महाराष्ट्रनगरच्या विकासासाठी शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
“मामाच्या मळ्यातील कणसं आम्ही आणली नाहीत, भाड्याची माणसंही नाहीत – आमचा आधार फक्त काम आणि माणुसकी आहे,” असा संदेश देत मतदारांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्रनगरमध्ये ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची नाही, तर जनतेने स्वतः निवडलेल्या माणसाची आहे – आणि तो कौल शिट्टीवर उमटण्याच्या मार्गावर आहे, असे जाणत्या मतदारांनी सांगितले.मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369










