मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १४३ (पत्राचाळ–मानखुर्द) येथील पुनर्वसन झालेल्या एसआरए गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचा संयम अखेर संपला आहे. रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही, स्वच्छतागृह नाही—या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विशेषतः महिलांना दररोज अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला.
अनेक सोसायट्यांमधील लिफ्ट महिनोन्महिने बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक व अपंग घरातच अडकून पडले आहेत. पावसाळ्यात पार्किंगमध्ये साचणारे घाणेरडे पाणी, मोकळ्या जागांतील दुर्गंधी, शेवाळ, डास–मच्छरांचा वाढता त्रास आणि उंदरांचा सुळसुळाट यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवरील फेरीवाले, भाजीविक्रेते आणि अपुरी भाजीमंडई यामुळे महिलांना दैनंदिन खरेदीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
वाहनांची प्रचंड गर्दी, साफसफाईचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. “खासदार, आमदार, नगरसेवक आले… आश्वासने दिली… पण समस्या तशाच राहिल्या,” असा संतप्त आरोप नागरिकांनी केला.
याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी थेट निर्णय घेत अपक्ष उमेदवार केशर सदाशिव (दाजी) बालगुडे यांना महापालिकेत पाठवण्याचा निर्धार जाहीर केला. “हा उमेदवाराचा नव्हे, तर आमचा—मतदारांचा विजय असेल. आता मतदारच उमेदवार आहे,” अशी ठाम भूमिका महिला-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369














