लोणी काळभोर प्रतिनिधी:
सध्या शिरुर हवेलीची निवडणूक आजवर आमदार अशोक पवार यांनी केलेली विकासकामे विरुद्ध विकासाचे कसलेही व्हिजन नसलेली मलिदा गॅंग अशीच सुरू झाली आहे.
अशोक पवारांचे विकासाचे राजकारण हे वीज, पाणी, शेती या शेतकऱ्यांच्या मुलभुत गरजांभोवती सतत फिरत रहाते. त्यामुळेच तालुक्यातील सुज्ञ जनता, सुशिक्षित तरुण वर्ग आणि अनेक उन्हाळे पाहीलेले जेष्ठ मंडळी पवारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहेत.
मात्र तालुक्याच्या याच विकासाला गालबोट लावण्यासाठी सध्या तालुक्यात मलिदा गॅंग नव्याने तयार झाली आहे. ज्यांना आपल्या जिल्हा परिषद गटाचा पाच वर्षांत कसलाही विकास करता आला नाही, त्यांना या मलिदा गॅंगने स्वतः च्या फायद्यासाठी उमेदवार म्हणून ,नेता म्हणून खांद्यावर घेतला आहे. त्यासाठी बेरोजगार तरुणांची माथी भडकावुन, त्यांना या प्रचारात अग्रभागी आणुन प्रसंगी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही मलिदा गॅंग या निवडणुकीत आपला मुख्य कार्यभाग साधत आहेत.
निवडणूक म्हटलं की वैचारिक विरोध हा आलाच. मात्र या निवडणुकीत ही मलिदा गॅंग वैचारिक विरोध करण्याऐवजी तालुक्याचा जोरात चाललेला विकासगाड्याला खीळ कशी घालता येईल, यासाठीच कटकारस्थाने रचत आहेत.
आणि म्हणूनच….
शिरूर हवेलीची निवडणूक जाहीर झाली, आणि त्याच क्षणी बर्याच दिवसांपासून दबा धरून बसलेली मलिदा गॅंग जागृत झाली. मुळात ही मलिदा गॅंग नेमकी कोण आहे, ती का तयार झाली, व या गॅंगचे काय उद्दीष्ट आहे ते पाहुया.
ही मलिदा गॅंग म्हणजे एके काळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या भोवती चोवीस तास कार्यरत असणारे कार्यकर्तेच होते. ज्यातील काहींना पक्षाने पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख बनवले. काहींना औद्योगिक वसाहती मध्ये व्यवसायांसाठी स्थिरस्थावर केले. यातुन ही सगळी मंडळी आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मजबुत झाली.सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक नियतीचा फेरा आला आणि अजित पवारांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला.
आता अशा वेळी शरद पवार साहेबांच्या पाठीशी ही मंडळी प्रामाणिकपणे उभी राहतील अशी खात्री होती. मात्र सरड्याने रंग बदलावे तसे या मंडळीनी रंग बदलले आणि भविष्यातील स्वतः चे राजकीय आणि व्यावसायिक अस्तित्व टिकवण्यासाठी या मंडळींनी एक गॅंग स्थापन केली. ही गॅंग म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दैवत आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांना विरोध करणारी गॅंग.
ही मलिदा गॅंग तशी हुशारच. विधानसभा निवडणुकी नंतर औद्योगिक वसाहतीमधील आपल्या व्यावसायांमध्ये इतरांचा कसलाही हस्तक्षेप होणार नाही, या कामांत कोणाचीही अडचण उभी राहणार नाही, कोणते काम कोणी करायचे, कोणाला कोणते काम द्यायचे, नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, सहकारी साखर कारखाना अशा पुढील निवडणुकीत आपापले राजकीय पुनर्वसन कसे करायचे या सगळ्यांची व्यवस्था लावुनच ही मलिदा गॅंग या निवडणुकीत सक्रिय झाली आहे.
केवळ स्वतः च्या व्यवसायिक आणि आर्थिक फायद्यासाठी तयार झालेली गॅंग तरुणांचा नेमका काय फायदा करून देणार हा प्रश्नच आहे.
म्हणूनच तरुणांनो अशा मलिदा गॅंगच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा किंवा बळीचा बकरा बनण्यापेक्षा स्वतः च्या आयुष्याचा आणि भविष्याचा तुम्ही स्वतः च विचार करा एवढीच विनंती.














