लोणी काळभोर प्रतिनिधी
पुष्पलता प्रकाश सावंत यांचा भाजपमधून अर्ज दाखल; पडद्यामागे अनेक घडामोडी, कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर लढण्याचा निर्णय
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना पुष्पलता प्रकाश सावंत यांनी अखेर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निर्णय अचानक वाटत असला, तरी यामागे पडद्यामागे घडलेल्या अनेक राजकीय घडामोडी, चर्चा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह कारणीभूत ठरल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीबाबत साशंकता होती. पक्षांतर्गत समीकरणे, तिकीट वाटपातील अनिश्चितता आणि शेवटच्या क्षणी बदललेले निर्णय यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या काळात प्रकाश सावंत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी “निष्ठावानाला डावलले तरी तुम्ही लढाच” अशी ठाम भूमिका घेत, सावंत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करताना प्रकाश सावंत यांनी भावनिक शब्दांत कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते म्हणाले,
“हा लढा पदासाठी नाही, तर स्वाभिमान, निष्ठा आणि जनतेच्या विश्वासासाठी आहे. अनेक वर्षे आपण एकत्र संघर्ष केला आहे. आज अडचणीचा क्षण असला तरी खचायचं कारण नाही. कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझं खरे बळ आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तुमच्यामुळेच मिळाली आहे.”
प्रकाश सावंत यांच्या या भावनिक आवाहनानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, “हा लढा शेवटपर्यंत नेऊ” अशी भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. निष्ठा, संघर्ष आणि जनाधार या मुद्द्यांवर सावंत कुटुंब मैदानात उतरल्याने मतदारसंघातील निवडणूक अधिकच चुरशीची व लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
पडद्यामागील राजकीय खेळी, तिकीट वाटपातील नाराजी आणि निष्ठावंतांची भूमिका या सर्व घटकांमुळे ही उमेदवारी केवळ औपचारिक न राहता स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा लढा बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369










